वणी :शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनासमोर विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने बाजार परिसरातील प्रायव्हेट मार्केटमधील काट्यांची तात्काळ तपासणी करून वजनातील गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांवर आर्थिक भार टाकणारी अडत प्रथा बंद करावी व शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया नियमितपणे सुरू करावी, अशी भूमिका मांडण्यात आली. याशिवाय काही व्यापारी व दलालांकडून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक लूट थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पारदर्शक व्यवहार, योग्य वजन आणि हमीभाव मिळण्यासाठी बाजार समितीने ठोस पावले उचलावीत, असे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना सातत्याने लढा देत राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.